आनंद दिघे गेलेले नाहीत, ते आजही आपल्यात आहेत आणि सर्व बघत आहेत. त्यामुळे येत्या काळात ज्यांनी गद्दारी केली त्यांना तेच शिक्षा देतील.बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा वारसा कोण पुढे नेतो हे आगामी निवडणुकीत जनताच दाखवेल, अशी टीका शिवसेना खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यवर नाव न घेता केली आहे.
स्व. आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त खारकर आळीतील शक्तिस्थळावर दिघे यांना अभिवादन करण्यासाठी खासदार राजन विचारे तसेच स्व. दिघे यांचे पुतणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे, माजी आमदार सुभाष भोईर आणि महिला आघाडीच्या अनिता बिर्जे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे यांच्या बंडानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे विरुद्ध ठाकरे गट असे चित्र निर्माण झाले. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो.
जेव्हा आपल्यांनीच केली गद्दारी आणि घात करून रातोरात ते झाले सत्ताधारी. गुरुवर्य तुम्ही म्हणजे अर्जुन घडवणारा द्रोणाचार्य खरे, ज्यांना घडवले तुम्ही, त्यांनीच संघटनेचा केलेला अपमान नव्हे बरा आणि म्हणून आमचा आनंद हरपला, असा संदेश विचारे यांनी व्हिडिओ क्लिपद्वारे दिला.