शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा काल करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याचंही यावेळी घोषणा करण्यात आली. यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान या युतीचा शिंदे गटावर काय परिणाम होणार यावर देखील चर्चा सुरु असताना शिंदे गटातील नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाबराव पाटील जळगावात बोलताना म्हणाले की, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही काम करत आहोत. आगामी निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तेव्हा कळेल. प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. काम करणाऱ्या लोकांवर कुठलाही फरक पडत नाही असं म्हणत शिंदे गटावर या युतीचा कुठलाही परिणाम होणार नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
जनता ही काम करणाऱ्यांना महत्व देत असते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चांगलं काम सुरू आहे. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडचे युतीची आम्हाला कुठलीही फिकीर नाही, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या शिवसेनेकडून राज्यभरात पक्ष संघटन बांधणीसाठी दौरे केले जात असताना दुसरीकडे शिंदे गट आहे कामाला लागला आहे. शिंदे गटाकडून राज्यभरात नियुक्त केल्या जात असून शिंदे गट हीच ओरिजिनल शिवसेना असून शिंदे गट शिवसेनेचा ओरिजनल गट असल्याचं मत शिंदे गटातील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे.