राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे. या वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य नागरिकांच्या घराचे बजेट बिघडताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस काळात आंदोलन करणाऱ्या आणि सत्तेत असलेल्या भाजपाला जोरदार याच मुद्द्यावरून टोला लगावला आहे.
काँग्रेसच्या राजवटीत पेट्रोल-डिझेलच्या दरांनी साठी ओलांडल्यानंतर देशभर आंदोलनांचे काहूर माजवून बेंबीच्या देठापासून कोकलणारी मंडळी आज सत्तेत आहेत, पण त्यांची तोंडे आता शिवलेली आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पेट्रोल दरवाढीविरुद्ध रणकंदन करणारी भारतीय जनता पक्षाची नेतेमंडळी आता मात्र मूग गिळून गप्प आहेत अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने जोरदार टीका केली आहे/
तसेच केंद्रीय सरकारला लागलेली अवाढव्य करांची चटक आणि तिजोरी भरण्याच्या हव्यासातच पेट्रोल-डिझेल दरवाढीचे मूळ दडले आहे. आता तर विमानाच्या इंधनापेक्षाही दुचाकींचे इंधन महाग झाले. इंधनाची ही ‘हवा-हवाई’ दरवाढ सामान्य जनतेची कंबर मोडणारी आहे. ‘बहोत हो गयी महंगाई की मार.’ अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने केलेला हा चमत्कार आहे. आपणच ओढवून घेतलेला हा ‘मार’ मुकाटय़ाने सहन करण्याशिवाय जनतेच्या हाती तरी दुसरे काय उरले आहे? असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.