भाजपाने द्रौपदी मुर्मू यांचे नाव राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांच्यासमोर बिगर भाजपा पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावरून राज्यात सुरू असलेले तर्क-वितर्क उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर थंडावले आहेत. शिवसेना मुर्मू यांनाच निवडणुकीत पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत आघाडीत असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर पेच निर्माण झाला आहे.
मात्र, स्वतंत्र निर्णय घेण्याचं शिवसेनेचं स्वातंत्र्य मान्य करत काँग्रेस-राष्ट्रवादीने या विषयावर पडदा टाकला आहे. मात्र, विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडण्यात चूक झाल्याचा आक्षेप प्रकाश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना घेतला आहे. “राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी माझ्याकडे एकही मत नाही. पण सध्या काँग्रेस पक्षाकडून दिवाळखोरीचं राजकारण सुरू आहे. त्यांना विचार नाही. हा पक्ष अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर पूर्णपणे शरण गेला आहे”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
दरम्यान, यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी आपण आदिवासी वर्गातलाच उमेदवार असायला हवा असे म्हणालो असल्याचे नमूद केले. ” याआधीही मी म्हणालो होतो की राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडत असताना तो आदिवासी वर्गातला असला पाहिजे. माझी ही भूमिका मी विरोधी पक्षाला कळवली होती. एकीकडे हे स्वत:ला विचारांचे ठेकेदार समजतात. पण दुर्दैवाने ते अक्कलशून्य आहेत”, असे आंबेडकर म्हणाले.
पक्षाला उभारण्यासाठी आनंद दिघे यांच्या काळातील जुन्या शिवसैनिकांवर जबाबदारी