दोनच दिवसांपूर्वी मंत्री विजय वडेट्टीवारांनी अनलॉक जाहीर केल्यानंतर काही क्षणातच मुख्यमंत्री कार्यालयानं राज्यात लॉकडाऊन कायम असल्याचं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं. त्यामुळे ठाकरे सरकारमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली होती. विरोधकांनी हा मुद्दा उचलून आघाडीला अडचणीत नात्याचा प्रयत्न केला होता, तर सत्ताधाऱ्यांमध्येही एकमेकांना चलबिचल पाहायला मिळत आहे. आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनीही आघाडीवर याच मुद्द्यावरून टीका केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला मोलाचा सल्ला दिला आहे. एका मंत्र्यांचा अपमान होत असेल, तर काँग्रेसने कॅबिनेटमधून बाहेर पडावं, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी दिलाय. एकेकाळी शिवसेना सत्तेची फळेही खायची आणि भाजपवर टीका ही करायची अशा दोन गोष्टी एकावेळी चालत नाही, असंही त्यांनी सुनावलं आहे.
आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्याचा वापर करून काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनलॉक जाहीर केलं, मात्र मुख्यमंत्र्यांनी ते रद्द केलं, हे चुकीचं असून आपत्ती व्यवस्थापनाचे निर्णय लागू झाले पाहिजेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करणं चुकीचं आहे आणि हे महाराष्ट्र संस्कृतीला न पटणारं आहे. कारण सध्या आपत्ती व्यवस्थापनाचा हाच निर्णय लागू झाला तर मुख्यमंत्र्यांची नाचक्की आहे. यांच्या खेळामध्ये सामान्य भरडला जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी यांनी केला होता.