चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे नाराज असल्याची चर्चा आता कोकणात जोर धरू लागली आहे. निमंत्रण पत्रिकेवर नारायण राणे यांचं नाव तीन नंबरला आहे. यामध्ये राजकारण झाल्याच्या राणेंचा आरोप आहे. यावरुनच शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.
राऊत म्हणाले की,“शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे निमंत्रण पत्रिका तयार केलीय. तीन नंबरच्या स्थानावरून रणकंदन करतील तर त्याचं ते अज्ञान आहे. त्यांनी चांगला गुरु ठेवावा, चांगले मागदर्शन घ्यावं”, असा निशाणा त्यांनी साधला आहे.चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याची कार्यक्रम पत्रिकाही छापण्यात आली आहे.
मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे तर तिसऱ्या क्रमांकावर नारायण राणे यांचं नाव आहे. चिपी विमानतळावरुन शिवसेना भाजपमध्ये श्रेयवाद घेण्याची जोरदार लढाई सुरु आहे. त्यात कार्यक्रमात पत्रिकेत राणेंचं नाव तिसऱ्या क्रमांकावर असल्याने राणे रुसल्याची चर्चा आहे. यावरच खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधलाय.
“केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रोटोकॉलप्रमाणे कार्यक्रम होणार आहे. प्रत्येकाचे स्थान ठरलेले आहे. कुठे कोण आहे, तीन नंबरच्या स्थानावरून उहापोह करतील तर त्यांचं ते अज्ञान आहे. त्यांना नेमकं कळत नाही की शासनाचा प्रोटोकॉल काय आहे, त्यांनी चांगला गुरू करावा म्हणजे त्यांना चांगले मागदर्शन मिळेल”, असा खोचक टोला विनायक राऊतांनी राणेंना लगावला.