कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी उद्या, रविवारी मतदान होत असून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. मागच्या पंधरा-वीस दिवस आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. माजी आमदार महादेराव महाडिक व आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणास लागल्याने पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
‘राजाराम’ कारखान्याचा संघर्ष निवडणुकीपुरता राहिला नाही; तर गेली पाच वर्षे सभासदांवरून महाडिक व पाटील यांच्यात न्यायालयीन लढाई सुरू राहिली. शह काटशहाचे राजकारण करत एकमेकांना रोखण्याची एकही संधी महाडीक व पाटील यांनी सोडली नाही. सभासद अपात्र, त्याला दिलेले आव्हान पुन्हा पात्र ठरले. सभासदांचा विषय संपल्यानंतर उमेदवार पात्र, अपात्रतेचा मुद्दा चांगलाच गाजला.कारखान्याच्या पोटनियमाचा काटेकोरपणे वापर करत विरोधी आघाडीतील दिग्गजांना निवडणूक रिंगणाबाहेर थांबवण्यात यश मिळवले.
या सगळ्या घडामाेडींचे पडसाद प्रचारसभांमध्ये उमटले. आव्हान, प्रतिआव्हान आणि त्यातून निर्माण झालेली इर्षा या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्या, रविवारी मतदान होत आहे. हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांतील ५८ मतदान केंद्रांवर उद्या, सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होत आहे. त्यासाठी ५८० कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत. साधारणता एका केंद्रावर दहा कर्मचारी नियुक्त केले आहेत.