महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात राज्य सरकार संपूर्णपणे सीमा भागातील बांधवांच्या भक्कमपणे पाठीशी उभे आहे. या संदर्भातील कायदेशीर लढाईसाठी वरिष्ठ विधिज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई येत्या ३ डिसेंबर रोजी बेळगाव येथे जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली कि, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बेळगावी येऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे. त्यानुसार मी आणि समन्वयक मंत्री शंभुराज देसाई ३ डिसेंबर रोजी दिवसभर बेळगाव येथे जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहोत, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे त्यामुळे लवकरच सीमा भागाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने या संदर्भात चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी नमूद केले आहे कि, महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात लढा सुरु आहे. अशा वेळी आपली समन्वयक मंत्री म्हणून नेमणूक झाली आहे. या प्रश्नाबाबत आणि इतर काही प्रश्नासंदर्भात बेळगाव येथील कार्यकर्त्यांशी आपण चर्चा करावी, अशी इच्छा या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. यासोबतच लवकरात लवकर बेळगावला भेट द्यावी अशी मागणीही त्यांनी या पत्रातून केली आहे.