‘तुमच्यामुळे करोडो लोकांना शिवराय समजले’ नितीन गडकरी यांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबई । संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र घराघरांत पोहोचवलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरें यांनी वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ३ दिवसांपासून बाबासाहेबांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने राज्यातील सर्व स्तरांतून शोक व्यक्त केला जातो आहे. त्यातच भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा जुन्या आठवणींना उजाळा देत बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत, जेष्ठ इतिहास संशोधक पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे अत्यंत वेदनादायी आणि अतिशय दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

तसेच एका दिव्य दृष्टीच्या दिग्दर्शक, अभिनेता, कलावंत, संघटक, लेखक, संशोधक, वक्ता आणि सर्वस्पर्शी अशा व्यक्तिमत्त्वास आज महाराष्ट्र मुकला आहे. अनेक दुर्गप्रेमी, इतिहास अभ्यासक, गिर्यारोहक, लेखक, वक्ते, संशोधक, दिग्दर्शक, अभिनेते, कवी, छायाचित्रकार, नेपथ्यकार घडवणाऱ्या बाबासाहेबांचे योगदान अक्षरशः थक्क करायला लावणारे असेच आहे.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करून शतायुषी होत असलेल्या सर्वार्थाने शिवमय अशा बाबासाहेबांच्या मनातील उत्साह आणि ऊर्जा, नवनवीन प्रकल्पांच्या कल्पना, वाचन, अभ्यास हे सारेच नेहमीच प्रेरणादायी आणि भारावून टाकणारे असेच होते.

आम्हांला आणि आमच्यासारख्या करोडो लोकांना शिवराय खऱ्या अर्थाने समजले ते बाबासाहेबांमुळेच! नुकतीच पुण्यात त्यांची भेट घेतली होती, तेव्हा शतायुषी बाबासाहेब पुढेही त्यांच्या वाणीतून शिवराय जिवंत करत राहतील ज्यातून आणखी एक पिढी घडेल, असा ठाम विश्वास होता. आणखी करोडो हृदये प्रज्ज्वलित होतील आणि बाबासाहेबांची वाणी त्यांना प्रेरणा देत राहील असा विश्वास होता. शेवटी एवढंच म्हणेन, बाबासाहेब आपण अजून हवे होतात, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: