बनावट कथानकाच्या फॅक्टरीतून महाराष्ट्राची बदनामी; फडणवीसांचा आरोप

 

आमच्या सरकारच्या काळात एकही उद्योग राज्याबाहेर गेलेला नाही, आधीच्या सरकारमध्येच ते गेले; पण सध्या बनावट कथानकांची फॅक्टरी उघडून त्याद्वारे महाराष्ट्राची बदनामी करण्याच्या हेतूने महाविकास आघाडीचे काही नेते तीन महिन्यांपासून सरकारवर आरोप करीत सुटले आहेत. महाराष्ट्रात गुंतवणूक येऊच नये, असे षडयंत्र त्यामागे दिसते, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केला.

आमच्या सरकारमध्ये उद्योग पळविले जात असल्याचा एकही पुरावा न देता हवेत आरोप केले जात आहेत. तीन महिन्यांच्या सरकारवर खापर फोडले जात आहे. काही ‘एचएमव्ही’ पत्रकार आणि राजकारणी मिळून ‘फेक नरेटिव्ह सिंडिकेट’ चालवीत आहेत, असे फडणवीस म्हणाले.

प्रकल्पनिहाय तारखा आणि त्या-त्या वेळी प्रकाशित वृत्त हे पुराव्यानिशी सादर करीत, त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उघडे पाडले. फॉक्सकॉनसंदर्भात ते म्हणाले की, ७ जानेवारी २०२० रोजीच तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही, हे स्पष्ट केले होते. मग आता आमच्यावर टीका का? एअरबस प्रकल्पासंदर्भात २३ सप्टेंबर २०२१ मध्येच एक वृत्त प्रकाशित झाले आणि त्यात उत्तर प्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांचा विचार केला जात असल्याचे सांगितले गेले.

१४ फेब्रुवारी २०२२ रोजी एक वृत्त प्रकाशित झाले आणि त्यात गुजरातमध्ये हा प्रकल्प येणार असल्याचे वृत्त आले. अगदी आता कालच्या अंकात एका राष्ट्रीय दैनिकाने सविस्तर वृत्त देत टाटा कंपनीच्या संपूर्ण पत्रव्यवहाराचा संदर्भ दिला. डिसेंबर २०२१ मध्येच एअरबससाठी गुजरातची जागा निश्चित झाली होती. मार्च २०२२ मध्ये टाटा ॲडव्हान्स सिस्टम्स लि.ने (टीएसीएल) गुजरात ॲथॉरिटी फॉर ॲडव्हान्स रुलिंग (जीएएआर) यांच्याकडे एक पत्र दिले आणि त्यात गुजरातमधील चार जागा निश्चित करण्यात आल्याचे सांगितले, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.

Team Global News Marathi: