कल्याण : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात राज्य सरकारकडून कोरोना संदर्भातील नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. त्यात राजकीय उत्सव, कार्यक्रम आणि लग्नसंभारंभाला उपस्थित राहणाऱ्यांसाठी काही नियम आखून देण्यात आले आहेत.
मात्र हे नियम धाब्यावर बसवून नियमांची पायमल्ली होत असल्याचे चित्रं कल्याण शहरात दिसून आले होते. विवाह सोहळ्यांचे आयोजक शासनाचे आदेश न पाळता गर्दी जमवून कार्यक्रम करीत असल्याने अशी मंगल कार्यालये आणि आयोजकांना धडा शिकविण्यासाठी पोलिसांनी कल्याणमधील भवानी आणि वैष्णवी ही दोन मंगल कार्यालये मंगळवारी टाळे ठोकून बंद केली आहेत.
तसेच या दोन्ही मंगल कार्यालयांच्या चालकांना शिक्षा म्हणून ही कार्यालये ३० एप्रिलपर्यंत बंद करण्यात आली आहेत. याशिवाय, कल्याण-शिळ फाटा रस्त्यावरील कोळेगाव येथे सेंट मेरी शाळेजवळ मोकळ्या जागेत १५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या वधू-वरांचे वडील नामदेव सखाराम पाटील, शंकर जोशी यांच्याविरुद्ध ई प्रभाग अधिकारी भारत पवार, मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. पी. वणवे यांनी गुन्हे दाखल केले आहेत.