नवी दिल्ली | जोपर्यंत समाजातील एखाद्याला घटकाला असमानतेची वागणूक मिळते तोपर्यंत आरक्षण सुरूच ठेवले पाहिजे, असे मत रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केले. सध्या राज्यात मराठा आणि OBC आरक्षणाचा मुद्धा चांगलाच तापलेला दिसून येत आहे, त्यातच आरएसएस आरक्षणाच्या विरोधात असल्याचे विधान केले जात असताना आता सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
‘मेकर्स ऑफ मॉर्डन दलित हिस्टरी’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी दत्तात्रेय होसबाळे बोलत होते. इंडिया फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना होसबाळे म्हणाले की, दलितांच्या इतिहासाशिवाय देशाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. सामाजिक सौहार्द तसेच सामाजिक न्याय हे आमच्या राजकीय धोरणाचे नव्हे, तर श्रद्धेचे विषय आहेत, असे होसबाळे यांनी यावेळी बोलताना नमूद केले.
देशात आरक्षण ऐतिहासिक दृष्ट्या गरजेचे आहे. जोपर्यंत असमानता आहे, तोपर्यंत आरक्षण कायम राहावे. समाजातील बदलांसाठी ज्यांनी प्रयत्न केले, त्यांच्यावर एका जातीचा शिक्का मारणे चुकीचे आहे. ते सर्व समाजाचे नेते आहेत. आरक्षण ही एक सकारात्मक कृती आहे. त्यामुळे आरक्षण आणि सामाजिक सौहार्द यांनी हातात हात घालून वाटचाल केली पाहिजे, असे होसबाळे म्हणाले.