काही दिवसांपुर्वी मोदी सरकारने माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं होतं. त्याजागी भारतीय हाॅकीचे माजी जादूगार खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने हा पुरस्कार आता दिला जाणार आहे. त्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत खेळाच्या माध्यमातून भाजप राजकीय डावपेच टाकत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी, महाविकास आघाडी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी म्हणजेच २० ऑगस्टला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं आहे.
देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा वाटा आहे. तो आधुनिकीकरणाचा केंद्रबिंदू देखील आहे. राजीव गांधी यांनी त्याच्या सरकारच्या काळात विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रावर भर दिला. त्यामुळे त्यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं आहे.