राज्यात सध्या कोरोना रूग्णसंख्येच्या आकडेवारीत झपाट्यानं वाढ होत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन सरकार काम करत आहे. अशात जोरदार राजकारण देखील पहायला मिळत आहे. राज्य सरकारनं गेल्या काही दिवसांमध्ये विविध क्षेत्रांवर असलेले निर्बंध आता कमी करण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील शाळा लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. तर दुसरीकडे पुणे शहर महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे परिणामी राज्य सरकार आणि भाजपमध्ये सध्या चांगलेच शीतयुद्ध सुरु झाले आहे. दैनंदिन कोरोना आकडेवारीचा आढावा आणि शाळासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीवरून आता बरंच राजकारण तापलं आहे.
स्थानिक प्रशासन म्हणजेच महापालिका आणि राज्य सरकार यांच्यात यावरून वाद पेटला आहे. अजित पवार यांनी बैठकीत विश्वासात घेत नाहीत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. शाळासंदर्भात अनेकदा राज्य सरकार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात जोरदार वाद पेटला होता. अशात आता पाटील यांच्या टीकेनंतर आता वाद वाढणार आहे.