काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. एवढंच नाही तर ते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेला देखील उधाण आलं आहे. अशातच समाजसेविका अंजली दमानिया यांनी अजित पवार भाजप सोबत जाणार असे ट्विट करून एकचं खळबळ उडवून दिली होती. मात्र महाविकास आघाडीमध्ये सर्व सुरळीत असून, अजित पवार नाराज नसल्याचा दावा नेत्यांकडून करण्यात येत आहे. यावर आता ठाकरे गट शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
भास्कर जाधव नवी मुंबईतील घणसोलीमध्ये आयोजित शिवसेनेच्या फिरत्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अजित पवार नाराज आहेत का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांंनी फार बोलण टाळलं. अजित पवार नारज आहेत की नाही हे तुम्ही त्यांनाच विचारा असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी भाजप नेते नितेश राणेंवर देखील जोरदार टीका केली. नितेश राणे यांना मातोश्रीवर टीका करण्याशिवाय दुसरं काय येतं.
त्यांनी गेल्या सात वर्षांमध्ये एक तरी सभा घेतली का असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी राणेंना लगावला आहे. शरद पवारांची नो कमेंट राहुल गांधींसोबत झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला मला ही बोलवलं होत, पण मला इथे काही कामं होती. मी उद्या दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेणार आहे, आम्ही सगळे त्यांच्यासोबतच आहेत असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान दुसरीकडे अजित पवार भाजपसोबत जाणार का या प्रश्नावर मात्र शरद पवार यांनी बोलंण टाळल्यानं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.