नवी दिल्ली : एअर इंडियाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. त्यांना VRS म्हणजेच स्वेच्छानिवृत्ती योजनेचा पर्याय देण्यात आला आहे. जर कर्मचाऱ्याचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा त्याने कंपनीत सलग २० वर्षे काम केले असेल, तर ते आता हा पर्याय निवडू शकतील. एअर इंडियाची सूत्रे टाटा समूहाकडे आल्यापासून कंपनीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.
त्यानंतर प्रथम उच्च व्यवस्थापन बदलण्यात आले, नंतर इतर काही अधिकारी बदलण्यात आले आणि आता त्यांना स्वेच्छानिवृत्तीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. याशिवाय कंपनीने जाहीर केले आहे की, जे कर्मचारी विहित वेळेत VRS साठी अर्ज करतील त्यांना एकरकमी रक्कम दिली जाईल.कंपनीत काम करणाऱ्या अकुशल कर्मचाऱ्यांसाठीही ही योजना लागू होणार आहे.
1 जून 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत एखाद्या कर्मचाऱ्याने स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केल्यास त्याला एकरकमी रक्कम तसेच सानुग्रह अनुदान दिले जाईल, असेही या घोषणेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे त्याचबरोबर, 1 जून ते 30 जूनदरम्यान स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करणार्या कर्मचार्यांना अनुग्रहाव्यतिरिक्त अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाईल. टाटा समूहाने 27 जानेवारी रोजी एअर इंडिया ताब्यात घेतली आणि चेअरमनपद एन. चंद्रशेखरन यांना देण्यात आले. कंपनीच्या पुनर्बांधणीसाठी ते सतत मोठ्या बदलांसाठी जोर देत आहेत.