केंद्र सरकारने 31 मे रोजी महाराष्ट्रासह 21 राज्यांना जीएसटी परतावा दिला. यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक 14 हजार 145 कोटी रुपये मिळाले. परंतु केंद्राकडून 15 हजार कोटी रुपये येणं अजूनही बाकी असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. याबाबत विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, “या संदर्भात अर्थमंत्री बोलतील किती पैसे आले आणि किती पैसे यायचे आहेत. पण आमची देणी द्या महाराष्ट्राला त्याची गरज आहे.
ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी दुर्बिणीने शोधून देखील शिवसैनिक सापडला नाही, असं भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले. यावर संजय राऊत म्हणाले की, “दुर्बिणीने ते काय काय बघतात हे पाहावं लागेल. त्यांच्याकडे दुर्बिणी लावल्या म्हणूनच बाबरी पडत असताना पळून गेले आणि शिवसैनिकांनी पाडली अशा प्रकारचे सत्य कथन भाजपच्या नेत्यांच्या तोंडून बाहेर पडले, पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये.”
भाजपविरोधी भूमिका घेऊन राजकारणात आलेल्या हार्दिक पटेलने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. परंतु आता काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. याविषयती संजय राऊत यांनी भाष्य केलं. “हार्दिक पटेल यांनी आपल्या स्वतःच्या भूमिका पडताळून पाहायला हव्यात. भाजपने देशद्रोही या शब्दाची व्याख्या त्यांच्याविषयी केली होती, ती काय होती. अर्थात असे अनेक मासे त्यांच्या गळाला लागत असतात. खोट्या केसेस, सत्तेचा गैरवापर यांच्यामार्फत दबाव आणले जातात. हार्दिक पटेल सुद्धा त्याच एका यंत्रणेचा बळी आहे,” असं संजय राऊत म्हणाले.