आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचे आवाहन केले असले तरीही आम्ही शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले

 

रायगड | प्रतिशिवसेना भवन उभारण्यात येणार म्हणत सहानुभूती मिळविण्याचा विरोधकांचा प्रयत्न सुरू असल्याचे नवनिर्वाचित उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. तर, येत्या काही दिवसात शिवसेनेची निशाणी आपण घेणार असल्याचा विश्वास आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. राज्यात स्थापन झालेल्या भाजप-सेना सरकारमधील एकनाथ शिंदे गटातील शिवसैना समर्थक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

संभाजीराजेची उमेदवारी नाकारणे ही गद्दारी होऊ शकत नाही का? असा सवाल उदय सामंत यांनी केला. तर, प्रतिशिवसेना भवन उभारण्यात येणार असल्याचा दावा करीत सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न विरोधक करीत असून असा कोणताही संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला नसून मध्यवर्ती कार्यालय असावे अशी भूमिका असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

विधानभवनाबाहेर झालेल्या बाचाबाची दरम्यान घोषणा न देणाऱ्या विरोधकांमधील काही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. तसेच आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीचे दरवाजे उघडे असल्याचे आवाहन केले असले तरीही आम्ही शिंदे साहेबांचे नेतृत्व स्वीकारले असून त्यांचा निर्णय बंधनकारक असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. तर, घटनापीठाकडे जे प्रकरण सुरू आहे त्यावर जाहीरपणाने बोलणे योग्य नसल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Team Global News Marathi: