नवी दिल्ली | देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख म्हणजेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचं काल तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालं आहे. दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी त्यांच्या IAF Mi-17V5 हेलिकाॅप्टरचा अपघात झाला. त्या हेलिकाॅप्टरमध्ये असणाऱ्या 14 पैकी 13 जणांचा मुत्यू झाला आहे. अशातच हा अपघात होता की घातपात?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
निवृत्त ब्रिगेडर हेमंत महाजन यांनी या घटनेबद्दल बोलताना बिपीन रावत यांना श्रद्धांजली वाहिली आणि हा घातपात असण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. वडिलांच्या बटालियनमध्ये त्यांनी प्रवेश केला होता. ईशान्य भारतातील घुसखोरी असो किंवा पाकिस्तानविरोधात त्यांनी सर्वाच ठिकाणी चांगलं काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी सीडीएस म्हणून देखील चांगलं काम केलं होतं, असं हेमंत महाजन यांनी म्हटलं आहे.
हवामानात बदल होतो किंवा एखादा पक्षी समोर आला की अशी घटना होण्याची शक्यता असते. मात्र, मला घातपाताची शक्यता वाटते, असं हेमंत महाजन म्हणतात. त्याचबरोबर, यामागे कोणता देश असेल त्यांना जशास तसे उत्तर द्यावेच लागेल. चीन सारख्या देशाने सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे का?, हे देखील आता पहावं लागेल, असंही हेमंत महाजन म्हणाले आहेत. पुण्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.