अडीच हजार वर्षांपूर्वी सगळे बौद्ध होते, असा अजब दावा रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलाय. “ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र सगळे बौद्ध होते. त्यानंतर या देशात हिंदू धर्म आला, नंतर हिंदू लोक झाले. इथले मुसलमान काही बाहेरून आलेले नाहीत. ते आधी हिंदू होते, हिंदूपूर्वी ते बौद्ध होते”, असा दावा रामदास आठवले यांनी केलाय.
वाद लावण्याचा प्रयत्न हा काही लोकांचा आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये वाद होणे हे देशासाठी फार मोठं नुकसान आहे. नरेंद्र मोदी हे ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ अशी भूमिका मांडत आहे आणि त्यांच्या भूमिकेला छेद देण्याची भूमिका ही राज ठाकरे यांची दिसते आहे, असं म्हणत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भोंगे वादावरून टीका केलीये.
‘राज ठाकरेंनी हनुमान चालीसेचे पठण मंदिरात करण्यात हरकत नाही. मशिदीवरचे भोंगे काढा अन्यथा आम्ही मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू, ही गुंडागर्दी योग्य नाही. माझा पक्ष हा बाबासाहेबांच्या संविधानाचे संरक्षण करणारा आहे. त्यांची भूमिका असंवैधानिक पद्धतीची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही भोंगे उतरविण्याची भूमिका घेतली नाही. राज ठाकरेंनी अंगावर भगवी शाल घातली आहे, तर चांगली गोष्ट आहे. कारण, भगवा हे शांतीचं प्रतीक आहे. गौतम बुद्धांच्या काळात बौद्ध भिक्खूंच्या वस्त्रांचा रंग हा भगवाच होता. भगवा रंग हा वाद लावण्याचा प्रतीक अजिबात नाही’, असंही ते म्हणाले.