नीरा-देवघर पाणी प्रश्नावरुन खासदार उदयनराजेंचा राष्ट्रवादीला घरचा आहेर

सातारा : नीरा देवघर धरणाच्या पाण्याचा प्रश्न गाजत असताना राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजेंनी यात उडी घेत पुन्हा एकदा राष्ट्रावादीला घरचा आहेर दिला आहे. त्यांनी राष्ट्रावादीचे नेते रामराजे निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी 14 वर्ष पाणी बारामतीला पळवलं. जमिनी लाटण्यासाठी काहींनी लोकांना पाण्यापासून दूर ठेवलं, असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.

१४ वर्षात अध्यादेश का काढला नाही? असा सवालही उदयनराजेंनी केला आहे. भगीरथ म्हणून घेणाऱ्यांनी लाल बत्तीचा वापर केला आणि लोकांची खिल्ली उडवण्यापलीकडे काही केले नाही, त्यांना देवसुद्धा माफ करणार नाही. अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीजे आणि गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे असंही उदयनराजेंनी म्हटलं. 1954 च्या पाणीवाटपानुसार नीरेच्या डाव्या कालव्यातून बारामतीला 43 टक्के तर उजव्या कालव्यातून सांगोला, फलटण, माळशिरस आणि पंढरपूरसाठी 57 टक्के पाणी देण्याचा निर्णय झाला होता. 2009 मध्ये अजित पवारांनी यात बदल करत बारामतीला पाण्याचा मोठा टक्का देऊ केला. मात्र, आता सरकारने पुन्हा एकदा 1954 च्या पाणीवाटपानुसार पाणी वाटप करण्याचा अध्यादेश जारी केला.

माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर यांनी निवडून येताच सांगोला येथील दुष्काळी बैठकीत याबाबत आवाज उठवत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाण्याची मागणी केली होती. त्यानंतर याबाबतचा निर्णय घेत बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी भागात वळवण्यात आले आहे. या दुष्काळी भागात सांगोला, माळशिरस, पंढरपूर फलटणला या भागांचा समावेश येतो.

धिरज करळे: