मुंबई | सिंधुदुर्गातील शिवसेनेचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपा आमदार नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर, आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे, त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. राणे आणि शिवसेना वादावर पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली होती,यातील मुख्य सूत्रधार हा सचिन सातपुते असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्या वरूनच पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांच्या अटकेची तयारी केली. तत्पूर्वी त्याची नोटीस देऊन चौकशी ही करण्यात आली होती. सध्या नितेश राणे फरार आहेत. त्यावरुन गुलाबराव पाटील यांनी नितेश राणेंना पळपुट्या म्हटलं आहे.
”नारायण राणेंना जे काही मिळालं ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या आशीर्वादानेच मिळालं. जिसके घर मे खाना, उसीमे छेद करना, असं काम त्यांनी केलंय. ते जर एवढे बहाद्दर आहेत, तर मुलगा पळपुट्या का आहे?. तुम्ही कोकणचे राजे आहात ना, मग आपला छोटो राजा कुठे आहे?,” असा थेट सवाल गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे.