नाशिक | गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय.
राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, राज्यात मशिदीवरील भोंग्याचा वाद सुरू असताना नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. नाशिकमधील 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या या आदेशाची आता चर्चा सुरू झाली आहे. नाशिकमध्ये जातीय तेढ निर्माण न करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.