कोल्हापूर | ठाकरे सरकारकडून वाईनला किराणा दुकानात विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयात शेतकऱ्यांचे हित आहे, असे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र वाईनला किराणा दुकानात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय योग्य आहे का? यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शीतयुद्ध पेटले आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. यात आता शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, ‘वाईनला किराणा दुकानात विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. जसं किर्तनाने माणूस सुधारत नाही, ना तो लावणीने बिघडतो. तसं किराणा दुकानात विक्रीची परवानगी दिल्याने वाईनचा खप वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. त्यामुळे हा विषय आता संपला पाहिजे. मात्र या सर्वांमधून शेतकऱ्यांची नाहक बदनामी सुरू आहे, म्हणून हे सर्व वेळीच थांबायला पाहिजे.’
पुढे पोलीस बदल्याच्या मुद्दयावरून बोलताना शेट्टी म्हणाले की, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या लोकप्रतिनिधींच्या सल्ल्यावरूनच होत असतात, याआधी त्या अनेकवेळा झाल्या आहेत. मात्र आता यामध्ये बदल झाला पाहिजे, पोलीस बदल्यांसाठी एक नियमावली निश्चित केली पाहिजे जेणेकरून हा बदल्यांचा धंदा बंद होईल, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.