मुंबई | राज्यातील दहा महापालिकेच्या निवडणुकांचे सर्वच राजकीय पक्षाला वेध लागले असून सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देऊन शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणी वाढवल्या होत्या. गेल्या काही दिवसांत पटोले यांच्याकडून वारंवार काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचा उल्लेख केला जात आहे.
तर दुसरीकडे भाजपाही स्वबळावर निवडणूक लढवत असल्याचं सांगत आहे. यापार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे संकेत दिले. यावर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भूमिका मांडली. मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबद्दल भाष्य करत युतीवर सूचक विधान केले आहे.
भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीत एकत्र आहोत. जनतेसाठी काम करतो आहे. हे समोर ठेवून पुढे काम करू. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी काल बैठक बोलावली होती. बैठकीत स्वबळावर निवडणूक लढण्याबाबत चर्चा झाली नाही. विधानसभा निवडणुकीला साडे तीन वर्षे वेळ आहे. जिथे पालकमंत्री आहेत, संपर्क मंत्री आहेत, तिथे फिरलं पाहिजे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आपल्या पक्ष समोर ठेवून लक्ष केंद्रित करावे अशी चर्चा झाल्याचं थोरात म्हणाले.