राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या महाराष्ट्राला पुन्हा लॉकडाउनच्या दिशेने घेऊन जात आहे. त्यात राज्य सरकारला केंद्राकडून पुरेशी मदत न मिळत असल्याचा आरोप पुन्हा एकदा करण्यात आला आहे तसेच विरोधीपक्षाने लॉकडाऊनला केलेला विरोध याच मुद्द्यावरून आजच्या सामना अग्रलेखातून केंद्रातील मोदी सरकारला आणि राज्यात विरोधी बाकावर बसलेल्या भाजपा सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
सामना अग्रलेखात म्हंटल आहे की, नोटाबंदी, लॉकडाऊन याची ओळख पंतप्रधान मोदी यांनीच देशाला करून दिली आहे. करोना संसर्गाची साखळी तुटावी म्हणून मोदींनीच वर्षभरापूर्वी लॉकडाऊनची घोषणा केली होती, तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी त्या निर्णयाचे थाळ्या वाजवून स्वागत केले होते. आज करोनाची परिस्थिती आधीपेक्षा जास्त गंभीर झाली आहे याचे भान महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने ठेवायला हवं. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री नाही याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेने का मोजावी? असा टोला सामनातून लागवण्यात आला आहे.
राज्यात करोना रुग्णसंख्येचा आकडा दररोज ५० ते ६० हजारांनी वाढत आहे. त्यावर उपाय म्हणून संपूर्ण लॉकडाऊनची तयारी राज्य सरकारनं चालवली आहे. येत्या १४ एप्रिलाल त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, विरोधी पक्षाने लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. अर्थचक्र बिघडेल आणि लोकांचा उद्रेक होईल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या विधानाचा सुद्धा आजच्या सामना अग्रलेखातून समाचार घेण्यात आला आहे.
लॉकडाऊनमुळं अर्थचक्र बिघडेल हे विरोधी पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे, पण सध्या माणसांचे प्राण गमावण्याचे जे ‘अनर्थचक्र’ सुरू आहे. १५ एप्रिलनंतर राज्याची करोना स्थिती गंभीर होईल असं मुख्य सचिव सीताराम कुंटे हेच जेव्हा सांगतात, तेव्हा त्याचं गांभीर्य विरोधी पक्षानं समजून घ्यायला हवं. ‘अर्थचक्र की अनर्थचक्र?’ यावर तत्काळ निर्णय घ्यायलाच हवा असं अग्रलेखात म्हंटले आहे.