राज्यात मराठा आणि OBC आरक्षणाचा मुद्धा तापत असताना सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून संसदेत गप्प बसलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे.
मराठा आणि धनगर समाजाला भाजपच आरक्षण देईल असं भाजप नेते रावसाहेब दानवे वारंवार सांगत असतात. पण जेव्हा ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठवून राज्यांना आरक्षण देण्याच्या सूचनेवर संसदेत मतदान घेण्यात आलं, तेव्हा रावसाहेब दानवेंचं तोंड बंद का होतं?, असा सवाल शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे.
विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट रावसाहेब दानवे यांचं नाव घेऊन त्यांच्याावर निशाणा साधला. केंद्र सरकारने आणलेलं १०२ वा घटना दुरुस्ती हे विधेयक अपुरं असल्याने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करून त्याचे अधिकार राज्यांना द्यावेत, अशी सूचना आम्ही केली होती.
मात्र आम्ही जी दुरुस्ती सूचवली होती. ती संसदेत मताला टाकली असता काँग्रेससह इतर पक्षांनी तिला पाठिंबा दिला. एकूण ७१ खासदारांनी त्याला पाठिंबा दिला. पण भाजपने विरोध केला. रावसाहेब दानवे काल तिथे होते. कोणत्याही परिस्थिीत भाजपच मराठा आणि धनगर समाजाला आरक्षण देईल असं सांगणारे दानवे तोंड गप्प करून बसले होते, अशी टीका राऊत यांनी केली.