मुंबई | भाजपा देशातील नव्हे, तर जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करतं. पण यांच्याकडे पोटनिवडणुकीसाठी देखील उमेदवार नाहीत. यांना इथले तिथले उपरे उमेदवार शोधावे लागतात. भाजपा म्हणजे नुसती प्लॅटफॉर्मवरची गर्दी आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला आता भाजपाने देखील प्रत्युत्तर दिलं आहे या टीकेला आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.
पाटील म्हणाले की, पंढरपूर आणि आता देगलूरला बाहेरून उमेदवार आणला अशी टीका करता, तर तुमची उमेदवारांची यादी वाचा अब्दुल सत्तार कोठून आले, भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा उमेदवार म्हणून पळविला. तो पराभूत झाला. तेथे आम्ही ज्याला निवडून आणले त्याला तुम्ही जागावाटपात जागा घेतल्यानंतर आमचा सिटिंग खासदार घेतला. तुम्ही शिवसेनेच्या ३०-३५ जागांवर भाजपाचे उमेदवार घेतले. गौरव नायकवाडी, कोरेगावचे महेश शिंदे, अशी मोठी यादी आहे. जागा सेनेची पण उमेदवार भाजपाचा असे घडले. तेव्हा आम्ही चुकीचे म्हटले नाही, असा निशाणा चंद्रकांत पाटील यांनी साधला.
काय म्हणाले होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
“मला काही मुख्यमंत्री व्हायची हौस नव्हतीच. तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही आणि मला वडिलांना दिलेलं वचन पाळायचं होतं, म्हणून माझ्यावर प्रशासनात यायची वेळ आली. पुत्र कर्तव्य म्हणून मी राजकारणात आलो. तुम्ही जर त्यावेळी शब्द पाळला असता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला असता तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. तुमचाही मुख्यमंत्री नक्कीच पाहायला मिळाला असता. पण नशीब नावाचीही एक गोष्ट असते जी तुमच्या बाजूनं नव्हती”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.