सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलेच तापू लागले होते. त्यातच खासदार छत्रपती संभाजी राजेंनी ठाकरे सरकारला ६ जून पर्यंतचा अल्टिमेट दिला आहे. याच मुद्द्यावरून मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षणामुळे विरोधकांनी ठाकरे सरकारवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर आता भाजपचे एससी सेलचे नेते धम्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळेच पदोन्नतीतलं आरक्षण रद्द झालं आहे. गरज नसताना यासाठी मंत्र्यांची उपसमिती नेमली गेली आणि त्या समितीचं अध्यक्षपद मराठा समाजाच्या अजित पवार यांना दिलं गेलं. मराठा समाजाच्या नेत्याला अनुसुचीत जाती, जमातीच्या समस्या कोणत्या प्रकारे समजणार? या सरकारमुळे पदोन्नतीतलं आरक्षण रद्द झालं आहे. पदोन्नीत आरक्षण मिळालं नाही, तर रस्त्यावर उतरु’, असा इशारा देखील मेश्राम यांनी दिला आहे.
पुढे बोलताना मेश्राम म्हणाले की, गरज नसताना मंत्र्याची उपसमिती करुन या उपसमितीचं अध्यक्षपद मराठा समाजाच्या अजित पवार यांना कसं दिलं गेलं?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. ओबीसी समाजाला मिळालेलं राजकीय आरक्षण संपण्यासाठी भाजप जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होता. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. तर पदोन्नतीत आरक्षणाबाबत काँग्रेस आक्रमक झाली आहे. सरकारने रद्द केलेलं पदोन्नतीतील आरक्षण आरक्षित वर्गाला देण्यात यावं, अशी भूमिका काँग्रेसने मांडली आहे.