मुंबई | केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर काल दिवसभर राज्यभर शिवसेनेकडून आंदोलनं झेडण्यात आले होते. यात राणेंना अटक झाली आणि रात्री उशिरा त्यांची जामीनावर सुटका झाली. या कारवाई प्रकरणी भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि कारवाईचा निषेधही केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली.
“जेव्हा कोणतीही व्यक्ती स्वत:ला राजा दाखवण्यासाठी धडपडत असते तेव्हा तो खरा राजा नसतो,” अशा शब्दांत अमृचा फडणवीस यांनी ट्विट करून घणाघाती टीका केली आहेत. महाविकास आघाडीवर यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी सातत्यानं टीका केली आहे. नारायण राणे यांच्यावरील कारवाईनंतर भाजपचे अनेत नेतेही आक्रमक होताना दिसत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेवर निशाणा साधला होता.
मुंबईत जुहू येथे नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर युवासैनिकांनी केलेल्या आंदोलनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याठिकाणी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवासैनिकांनी जोरदार आंदोलन केलं. यात राणे समर्थक आणि युवासैनिकांमध्ये राडाही झाला. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता. मात्र आता अमृता फडणवीस यांच्या टीकेला महिला शिवसैनिक काय उत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.