पुणे | पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, आदी भागांत पावसाने जोरदार बॅटिंग केली असून यामध्ये बळीराजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. चिंताग्रस्त बळीराजाला दिलासा देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या कॅबीनेटमध्ये नुकसानग्रस्तांच्या मदतीबाबत निर्णय घेतला जाईल, असा शब्द शेतकऱ्यांंना दिला आहे. अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यात लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. हजारो हेक्टर शेती अजूनही पाण्याखाली आहे. सोयाबीन, कपाशीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या सगळ्यानंतर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरकारच्या मदतीकडे डोळे लागले आहेत. याच शेतकऱ्यांना पुढच्या आठवड्यात मदतीचा शब्द अजितदादांनी दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी काही पॅकेज जाहीर करणार आहात का? शासनस्तरावर काय मदत केली जाणार आहे?, असे पत्र यावेळी पत्रकारांनी विचारले. त्यावर येत्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल, हे पाहिलं जाईल, असं अजित पवार म्हणाले. राज्यात गेल्या आठवड्यात तुफान पाऊस पडला. मोठा भाग पूरग्रस्त बनला. अनेक ठिकाणी पावसाचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळाला. बळीराजाचं मोठं नुकसान झालंय. आता विमा कंपन्यांना सूचना दिलेल्या आहेत. लवकरात लवकर शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, अशा सूचना दिलेल्या आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं.