मुंबई : मुंबई शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, याच पार्श्वभूमीवर मुंबईबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात शनिवार आणि रविवार असा दोन दिवसाचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना आव्हान केले आहे.
कोरोना परिस्थितीत मुंबईकरांची जेवढी काळजी घेता येईल, तेवढी घेण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्यामुळे कुठेही प्रशासन म्हणून आम्ही हलगर्जीपणा करत नाही आहोत. लोकांनी साथ देणं गरजेचं आहे. तुम्ही पॉझिटिव्ह आलात, तर कोविड सेंटरमध्ये येऊन अॅडमिट व्हा. जास्त गंभीर असेल, तर आपण खासगी रुग्णालयात देखील बेड उपलब्ध करून देऊ.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,आमच्या वॉररूममधूनच तुम्ही बेड मिळवले पाहिजेत. थेट येणाऱ्या रुग्णांना हॉस्पिटल व्यवस्थापनाने आणि कोविड सेंटरमध्ये देखील अटकाव करावा. व्हेंटिलेटर आणि आयसीयूचे बेड गरजेप्रमाणे रुग्णांना मिळायला हवेत. त्यासाठी नियम पाळायला हवेत’, असे महापौर पेडणेकर यांनी बोलून दाखविले होते.
पुढे विरोधकांचा समाचार घेताना त्या म्हणाल्या की, मुंबईत गळे काढणारे आता सांगत आहेत की लस उपलब्धतेवरून खोटे दावे केले जात आहेत. पण हॉस्पिटलमध्येच लसीचा शून्य साठा, एक दिवसाचा किंवा दोन दिवसांचा साठा असं दाखवत आहेत. ते कसं खोटं होऊ शकतं? इतर राज्यांच्या तुलनेत लस वाया जाण्याचं प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे. इतर राज्यांमध्ये ६ टक्के, ७ टक्के आहे. त्यामुळे मुंबईकरांना हात जोडून विनंती की या गळे काढणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका असे आव्हान त्यांनी केले आहे.