भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचे विधान केले होते. लाड यांच्या या विधानावर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे अशातच आत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि खासदार संजय राऊतयांनीही याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिंदे – फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला. शिवाजी महाराजांवर बोलण्याची यांची लायकी आहे का? तुम्ही दररोज नवनवे शोध लावत आहात. भाजपने इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापना केली आहे का? हे नवीन इतिहास लिहणार महाराष्ट्राचा, असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला.
कोण प्रसाद लाड? ते काय दत्तो वामन पोतदार आहेत का? भाजपमधला कोणीही उठतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर एक नवीन विधान करतो. हे काय दत्तो वामन पोतदार किंवा सेतू माधव पगडी किंवा इतिहासकार यदुनाथ सरकार आहेत का? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला.
भाजपचं डोकं फिरलं आहे. शिवाजी महाराजांची शक्ती यांना खतम करेल. महाराजांची भवानी तलवार आहे ती तलवारच यांच्या पक्षाचे मुंडके छाटेल. रोज कोणी तरी उठतो आणि शिवाजी महाराजांवर भाष्य करतो. मला वाटतं, यांच्या स्वप्नात अफझल खान आणि औरंगजेब येत असेल आणि यांच्या कानात एक मंत्र देत असेल. त्यामुळे हे लोक असे बरळत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.