राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर येणाऱ्या आगामी निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढणार असे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिले होते. मात्र दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची नारा देऊन आघाडीत सर्वकाही अलबेल नाही याचे संकेत दिले होते. आता पवारांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा नाना पटोले यांनी भाष्य केले आहे.
सत्तेमध्ये आणि आगामी निवडणुकांविषयीच्या विधानांमध्ये फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीच असतात, यासंदर्भात विचारणा केली असता नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही आधीपासूनच आगामी निवडणुकांबद्दलचे आमचे धोरण जाहीर केले आहे. समजा आम्ही सोबत आहोत असे म्हटले आणि ऐन निवडणुकांच्या वेळी स्वतंत्र लढणार असे सांगितले, तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखे होईल. त्यामुळे आजपासूनच आम्ही म्हणतोय, आम्ही स्वतंत्रच लढणार, असे पटोले म्हणाले.
काय म्हणाले होते शरद पवार : नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये काँग्रेस महाविकास आघाडीसोबत दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.