शहरातील रामलिंग खिंड येथील रस्त्यावर शिवसेनेच्या रुग्णवाहिकेला कन्नड संघटनांनी काळे फासण्याचा प्रयत्न काल केला होता.या झालेल्या वादावरून सीमाभागात वातावरण चांगलेच तापले आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र सरकारला सर्व ताकदीनिशी बेळगावात उतरावे लागेल. परिस्थिती हाताबाहेर गेली तर महाराष्ट्र सरकार किंवा शिवसेनेनेला जबाबदार धरु नये. डोकी फुटली तर दिल्लीला रडत जाऊ नका, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिलेली आहे. राऊत यांनी प्रतिक्रिया देत एकप्रकांरे कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
आज बेळगावात मराठी नागरिकांवर, शिवसेनेच्या कार्यालवर हल्ले होत आहे. त्यामुळे तेथील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या परिस्थितीला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार आहे, असे म्हणत पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे