राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने ठाकरे गटावर विशेष करून उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला होता. यावरून दोन्ही बाजुंच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.आता पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बावनकुळे यांनी आता उद्धव ठाकरेंना सत्तेतचे व्यसन लागल्याचा आरोपच केला आहे.
बावनकुळे म्हणाले की, “आमच्यासाठी सत्ता हे साध्य नाही तर जनकल्याणाचे आणि अंत्योदयाचे साधन आहे. उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजिर खुपसला. त्यांना आता सत्तेचे व्यसन लागले तिन्ही पक्षांचा विचार महाराष्ट्राचा सत्यानाश करत आहे. महाविकास आघाडीच्या सभामंध्ये एक नेता बोलताना इतर तीन लोक वेगळेच बोलतात. अर्धी गर्दी कार्यक्रम सोडून निघून जाते. उद्धव ठाकरेंचे भाषण सुरू असताना 50 टक्के लोक निघून गेले होते.”
पुढे ते म्हणाले, “सत्तेची नशा कधी, कशी आणि कुणाला लागली हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगूच नये. ते राज्यातील तमाम जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या व्यसनापायी ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून 2019 मध्ये ते कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीवर ते जाऊन बसले. ठाकरे यांच्याकरिता सत्ता हेच साध्य आहे. त्यांना सत्तेचे व्यसन जडले आहे,” अशी टीका बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये केली.