उद्धव ठाकरे यांना सत्तेतून दूर करण्यासाठी काही कपटी लोकांनी…

मुंबई : पुन्हा एकदा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. गुजरातमध्ये निवडणुका आल्या की, आपले उद्योग पळवले. कर्नाटकच्या निवडणुका लागल्या की, त्यांनी महाराष्ट्रातील गावं पळवायला सुरुवात केली.जर अशाच पद्धतीनं सुरु राहीलं तर महाराष्ट्रासाठी आम्ही आहोत असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस कधी बोलणार? असा सवाल शिवसेनेच्या अंधारे यांनी केला.

महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत. अशा स्थितीत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणत आहेत की, हे उद्योग माझ्या काळात गेले नाहीत. ते खोटं बोलत असल्याचे अंधारे म्हणाल्या. लाखो बेरोजगारांच्या हातचा घास हिरावून घेण्याचं काम सुरु असल्याचे त्या म्हणाल्या. मुलुंडमध्ये शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेत अंधारे बोलत होत्या.

उद्धव ठाकरे यांना सत्तेतून दूर करण्यासाठी काही कपटी लोकांनी पाठीत खंजीर खुपसला. पण आम्हाला उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहायचे असल्याचेही अंधारे म्हणाल्या. काही जण म्हणतात सुषमा अंधारेंकडे आम्ही लक्ष देत नाही, लक्ष देत नाही तर एका दिवसात माझ्यावर पाच पाच कॅबिनेट मंत्र्यांना का बोलावं लागतं? असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला. सध्या महिलांचे प्रश्न ऐरणीवर असताना याबाबत देवेंद्र फडणवीस लक्ष घालत नसल्याचे अंधारे म्हणाल्या आता अंधारे यांच्या टीकेला शिंदे फडणवीस सरकार काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: