कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही, त्या उद्धव ठाकरे यांनी कटकारस्थान करुन मुख्यमंत्रीपद मिळवले.

पंढरपूर: विधानसभा निवडणुकीवेळी गद्दार शिवसेनेसोबत  युती करायला नको, असे भाजपमधील अनेक नेत्यांचे मत होते. पण देवेंद्र फडणवीस  यांना सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे होते. मात्र, शिवसेनेने त्यांची जात दाखवली, अशी जळजळीत टीका भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी केली.

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी पंढरपूरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत सुभाष देशमुख बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. गद्दार शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीत युती नको, असे भाजपमधील नेत्यांचे मत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना सगळयाना सोबत घेऊन जायचे होते. त्यामुळेच भाजपने शिवसेनेशी युती केली. मात्र, शिवसेनेने त्यांची जात दाखवली, असे सुभाष देशमुख यांनी म्हटले.

याच प्रचारसभेत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दांत वार केला. परीक्षा चांगल्याप्रकारे पास झाल्यानंतरही देवेंद्र फडणवीस विरोधी बाकांवर बसले. मात्र, आयुष्यात कधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही, त्या उद्धव ठाकरे यांनी कटकारस्थान करुन मुख्यमंत्रीपद मिळवले. थूत तुज्या जिंदगानीवर, असे वक्तव्य लक्ष्मण ढोबळे यांनी केले.

‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय’

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला दुसऱ्यांच्या लग्नात नाचायची सवय आहे. भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. अन्यथा गोपीचंद पडळकर आमदार झाला नसता. भाजपच्या नेत्यांवर खालच्या शब्दांत टीका कराल तर याद राखा. तुमच्यावरही तशाच पद्धतीने टीका केली जाईल, असे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.

अजित पवारांसोबत पुन्हा शपथ घेणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

गेल्यावर्षी अजित पवार यांना हाताशी धरुन देवेंद्र फडणवीस  यांच्याकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी पंढरपुरात प्रसारमाध्यमांकडून तुम्ही पुन्हा अजित पवार  यांच्यासोबत शपथ घेणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी काळजी करु नका, आता फक्त भाजपचेच सरकार येईल, असे उत्तर दिले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: