सिंधुदुर्ग : राज्यात शिवसेना पक्षाने भारतीय जनता पक्षाला दूर सारून राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र सत्तेवर विराजमान होताच आघाडी सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नव्हती त्यातच आता भाजपा नेते आणि माजी खासदार नितेश राणे यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले दिसून येणार आहे.
शिवसेना नेते, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्ग येथे बोलताना नितेश राणे यांनी हा खळबळजनक खुलासा केला.
“तौक्ते चक्रीवादळाची गंभीर परिस्थिती सिंधुदुर्गात असतानाही उदय सामंत देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी खास रत्नागिरीत आले होते. त्या दोघांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली” असा गौप्यस्फोट निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांच्या या खळबळजनक दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. मात्र या दाव्याला अदयाप दोन्ही नेत्याकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही आहे.
मात्र तौक्ते वादळात नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा सोडून उदय सामंत यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेण्यासाठी तातडीने रत्नागिरीत येण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही भेट झाली का, भेट झाली असल्यास त्याचं नेमकं कारण काय, दोघांमध्ये नेमकी कसली चर्चा झाली, असे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.