मुंबई | यंदाच्या वर्षी मान्सून काही दिवसांपूर्वीच राज्यात दाखल होईल असा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारीच मान्सून अंदमानात दाखल होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. तिथं अजून मान्सून राज्याच्या वेशीवरही आला नाही, तोच त्याचं वेळापत्रकही आपल्या हाती आलं आहे. यावर्षीच्या मोसमातील 17 दिवस उधाण भरतीचे असणार आहेत. तर, जून महिन्यात सर्वाधिक पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
अतिवृष्टीमुळं जून महिन्यातच मुंबई तब्बल 6 वेळा पाण्याखाली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाळ्यामध्ये 17 वेळा साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच लाटांपेक्षाही पाण्याची उंची अधिक असेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळं आतापासूनच यंत्रणा तयारीला लागल्या असल्याचं चित्र दिसत आहे.
फक्त मुंबईच नव्हे, तर कोकण किनारपट्टीचा काही भाग समुद्राच्या पाण्याखाली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. इतकंच नव्हे, तर देवबागच्या किनाऱ्यालाही अतिवृष्टीचा तडाखा बसणार आहे. वातावरणात अतिशय झपाट्यानं होणारे बदल पाहता मान्सूनची सुरुवात झाल्या क्षणापासून महाराष्ट्रात त्याचे थेट आणि मोठे परिणाम दिसून येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्यामुळं यंत्रणांसोबतच आता नागरिकांनीही सावध होणं गरजेचं आहे.