मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकीचे पात्र मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे अशातच यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संकटी राऊत यांनी भाष्य केले आहे. तुम्ही इतकी वर्षे महाराष्ट्रात राहताय, तुम्ही ठाकरे आहात, तुम्हाला हात लावण्याची हिंमत कोणामध्ये आहे का? राज ठाकरे यांच्या केसालाही महाराष्ट्रात धक्का लागणार नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले.
मशिदींवरील भोंग्यांविरोधात भूमिका घेतल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना धमकीचे पत्र आले होते. याविषयी संजय राऊत यांना विचारणा झाली असता त्यांनी ही शक्यता साफ फेटाळून लावली. महाराष्ट्रात सर्वजण सुरक्षित आहेत. तुम्हाला धोका असेल तर राज्यातील गृहखाते आणि पोलीस तुमच्या रक्षणासाठी सक्षम आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांना धमकीचे पत्र आले होते. यावरून संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. कोणीही कोणाला हात लावत नाही. शिवसेना भवनात अशी पत्रं शेकड्याने येत असतात. महाराष्ट्र सुरक्षित आहे. महाराष्ट्रात कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. लागणार असेल तर केंद्र सरकार CISF च्या जवानांची सुरक्षा द्यायला समर्थ आहे, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला.
पुढे बोलताना राऊत महाले की, तुम्ही इतकी वर्षे महाराष्ट्रात राहत आहात, ठाकरे आहात. तुम्हाला हात लावण्याची हिंमत कोणीही करणार नाही. किंबहुना महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याला हात लावण्याची हिंमत कोणीही करणार नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे. त्यामुळे स्टंटबाजी बंद करा, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना सुनावले.