मुंबई | भारतातील टेलिकॉम रिचार्ज पॅकची वैधता मात्र सरासरी केवळ २८ दिवस असते याच मुद्दयावरून काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेना आंदोलन करत असून ट्राय (TRAI) अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण यांना पत्र लिहिले होते तसेच या मागणीवर सविस्तर विचार करण्याची विनंती केली होती. सतत एमएनटीसीने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत तसेच ग्राहकांची टेलिकॉम कंपन्यांकडून होणाऱ्या लुटमारीला आळा घालण्यासाठी ट्रायने (TRAI) सर्वच टेलिकॉम कंपन्यांना ३० दिवसांची सेवा पुरवण्याचे आदेश दिले होते. या संदर्भात दोनच दिवसांपूर्वी एक परिपत्रक प्रसिद्ध केले होते.
मात्र आपला फायदा आणि ग्राहकांचा तोटा शोधण्यात टेलिकॉम कंपन्यांचा हातखंडा असल्यामुळे ट्रायने दिलेल्या आदेशांप्रमाणे लवकरात लवकर ३० दिवसांची सेवा टेलिकॉम ग्राहकांना पुरवण्यात यावी याच मागणीच्या मुद्द्यावरून आज दि. ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी एनएमटीएस अध्यक्ष मा. श्री. सतीश रत्नाकर नारकर तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारती एअरटेल लि. सहावा मजला, इंटरफेस बिल्डिंग क्र. ७ न्यू लिंक रोड, मालाड पश्चिम येथील प्रशासकीय अधिकार्यांची सतीश नारकर यांच्या अध्यक्षतेखाली भेट घेण्यात आली होती.
या भेटीदरम्यान त्यांना एमएनटीएसच्या प्रमुख मागण्याचे पत्र एअरटेल कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले होते तसेच ट्रायने दिलेल्या आदेशांप्रमाणे लवकरात लवकर ३० दिवसांच्या व्हॅलिडिटीने सर्व प्लॅनची सेवा पुरवण्यात यावी नाहीतर कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात एमएनटीएस आंदोलन छेडेल असा इशारा वजा समज अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे येत्या ३० ते ४५ दिवसात ट्रायने दिलेल्या नियमांप्रमाणे ग्राहकांना सेवा पुरवू असे आश्वासन एअरटेल कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे. तसेच हा प्रश्न निकाली लागेपर्यंत एमएनटीएस आपले आंदोलन असेच सुरु ठेवणार आहे असे सुद्धा नारकर यांनी सांगितले होते.