वाढणारी गर्दी रोखण्यासाठी केंद्र सरकारने व्यापक धोरण आणावे, मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांना विनंती |

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत युरोपात होत असलेल्या कोरोना संसर्गाच्या रुग्ण वाढीवरून राज्यात सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या पूर्वेकडील देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हा आपल्यासाठी धोक्याचा इशाराच आहे, असं सांगतानाच कोरोनाची तिसरी लाट आपल्याही दाराशी आली आहे. त्यामुळे सावध राहा. काळजी घ्या, उपाययोजना करा, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

तसेच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने विविध धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कारणांसाठी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता त्यांच्या स्तरावरून देशपातळीवर व्यापक धोरण आणावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पावले आणि तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिली.

Team Global News Marathi: