दिल्लीत आंदोलन करणा-या शेतक-यांना पाठींबा देण्यासाठी, घाटनदेवी मंदिर परिसरात हजारो शेतकरी जमले…
नाशिक – दिल्लीत आंदोलन करणा-या पंजाबच्या शेतक-यांना पाठींबा देण्यासाठी आज इगतपुरीमध्ये घाटनदेवी मंदिर परिसरात हजारो शेतकरी जमले. गाठीशी पीठ, मीठ, मिरची असा शीधा घेऊन आज मंदिर परिसरात विश्रांतीसाठी थांबले होते, आज सकाळी मुंबईकडे रवाना झाले.
अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पायी निघालेला हा जत्था केंद्र सरकारचे तिन्ही कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत. मूठभर कॉर्पोरेटस्ना मदत करण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा घाट घातला जातोय. यास विरोध करण्यासाठी गेल्या ५८ दिवसांपासून देशातील पाचशे शेतकरी संघटना एकत्र येऊन संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक लढा देत आहे.
दिल्लीतील हा लढा मजबूत करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेचा ‘नाशिक ते मुंबई वाहन मार्च आज सकाळी मुंबईकडे रवाना झाला. सोमवारी आझाद मैदानावर जमून सरकार विरोधात एल्गार करण त्यानंतर ते राजभवनवर जाऊन निवेदन देतील.
“लढू अन् सरकारला कायदे मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडू’ या जिद्दीने या मोर्चात राज्याच्या विविध जिल्ह्यातून हजारो शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थी सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवले. शेतकरी न्यायहक्कांसाठी लढा देत असताना सरकार मनमानी करत आहेत. त्यामुळे आता सरकारला जाग आणण्यासाठी संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा सोमवार पर्यंत चालणार आहे.
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी बदल रद्द करा, वनजमीन तथा देवस्थान, गायरान, आकारीपड, बेनामी व वरकस जमीन कसणारांच्या नावे करा आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी पुन्हा सुरू करून सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ द्या, या मागण्या आहेत.
२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर राष्ट्रध्वज फडकवून, राष्ट्रगीत गाऊन आणि शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करून या महामुक्कामाची सांगता होईल.