यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली ही विनंती

गेल्यावेळेपेक्षा यावेळचे कोरोना व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याने नागरिकांनी शासन प्रशासनास सहयोग द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले. ओझर विमानतळ येथील बैठक कक्षात कोरोना विषयक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

 

यावेळी बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, कोविडचे लसीकरण करून घेण्याबाबत जनतेमध्ये जागृती वाढत आहे. त्यामुळे लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे. त्यादृष्टीने नाशिक शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी मनपा आयुक्तांना दिले.

 

गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष ठेवणे आवश्यक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी तसेच वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस विभागाला दिली.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दी नियंत्रण यात समन्वय साधणारे असल्यामुळे त्याची कठोर अंमलबजावणी करावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच नागरिकांचा या सर्व निर्बंधांना मिळणारा प्रतिसाद पाहून याबाबत पुढील निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.

‘मी जबाबदार’ मोहिमेअंतर्गत भित्तीपत्रकांचे अनावरण

शासनाच्यावतीने ‘मी जबाबदार’ मोहिम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने या मोहिमेला पुढे घेवून जाण्यासाठी भित्तीपत्रकाच्या माध्यमातून विशेष उपक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत भित्तीपत्रकांचे अनावरण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला उपक्रम स्तुत्य असून या भित्तीपत्रकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होईल व जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेला नागरिक प्रतिसाद देतील असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

राज्याचे मुख्य सचिव श्री सिताराम कुंटे यांनी वरील त्रिसूत्री सोबतच लसीकरणाचा बाधित क्षेत्रामध्ये सुयोग्य वापर करून रुग्ण वाढ थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सिव्हिल सर्जन यांचेकडून आरोग्य विषयक विविध बाबींची माहिती घेतली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: