याला चिंधी विचार म्हणतात साहेब, निलेश राणेंचा पुन्हा अजित पवारांवर हल्लाबोल

माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांवर टीका केली आहे. देशात मोगलाई आहे का या अजित पवारांच्या सवालावरुन निलेश राणेंनी जोरदार टिका केली आहे. “अजित पवारांना महाराष्ट्रात मोगलाई आहे का असं म्हणायचं होतं, चुकून देशात म्हणाले, हेराफेरी करुन पद मिळाल्यावर असं होतं”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं. इतकंच नाही तर “परवा भाषणात कुठेतरी मी अनेकवेळा आमदार झालो पण जॅकेट घातलं नाही असंही अजित पवार म्हणाले, याला चिंधी विचार म्हणतात साहेब, तुम्ही उपमुख्यमंत्री आहात महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला”, असा घणाघात निलेश राणे यांनी केला.


अजित पवार काल अमरावती दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “देशातील शेतकरी आपल्याला मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात. शेतकऱ्यांना यापूर्वी कधीही अशाप्रकारची वागणूक मिळाली नव्हती. आता या देशात मोगलाई आली आहे का”, असा संतप्त सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला. या टीकेवरूनच राणे यांनी टोला लगावला होता.

Team Global News Marathi: