धर्माची गोळी दिली की लोक झोपून राहतात, हे त्यांना माहित आहे – जितेंद्र आव्हाड 

 

 

महाराष्ट्रात सतत वणवा पेटवण्याचा प्रयत्न केला जात असून, धर्माची गोळी दिली तर लोक झोपून राहतात हे माहीत असल्यानेच त्यांना गोळी देऊन झोपविले जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय जनता पक्षावर केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सतत बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून, आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

गृहनिर्माण मंत्री आव्हाड एका कार्यक्रमासाठी रविवारी कोल्हापूर दौऱयावर आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. हल्ली राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रत्येक मुद्दय़ात ओढून-ताणून आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. कारण धर्मांध शक्तींना रोखणारा शरद पवार हा एकच हिमालय असल्याचे विरोधकांना माहिती आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्याप्रमाणे आता पवार यांनाही बदनाम केले जात असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

 

 

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी तपास यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका निरपराध मुलाला डांबून ठेवणे ही पद्धत चुकीची असून, बालमनावर त्याचा काय परिणाम होत असेल, याचाही सर्वांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. केवळ शाहरुख खानचा मुलगा आहे हे कारवाईचे कारण होऊ शकत नसल्याचे सांगत, ईडीच्या कारवायांना आम्ही महत्त्व देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

Team Global News Marathi: