नाशिक | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना खासदार छत्रपती संभाजी राजनेंनी रायगडावरून आंदोलनाची हाक दिली होती. जे होत्याच ते होऊ दे मात्र मराठा समजला आरक्षण मिळू पर्यंत शांत बसणार नाही असा इशारा सरकारला संभाजी राजेंनी दिला होता. या त्यांच्या आंदोलनाच्या पवित्र्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते, याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे.
एकीकडे भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा संघटनांच्या पाठिशी आपली ताकद उभी केलेली असताना दुसरीकडे भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्व मराठा संघटनांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती आणि विनायक मेटे यांनाही एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती विखे-पाटील यांनी आज लोणी इथं माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मराठा समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी आपण बैठका घेत असल्याचं विखे-पाटील यांनी सांगितलं आहे. या बैठकांमध्ये मराठा आंदोलनाच्या भविष्यातील रणनितीबाबत चर्चा करण्यात येत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सगळ्या संघटनांच्या नेत्यांनी एकत्र यावं असं आवाहन आपण करत असल्याचं विखे-पाटील म्हणाले. खासदार संभाजीराजे आणि विनायक मेटे यांनाही एकत्र आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राज्यात २३ संघटना काम करत आहेत, मग भूमिका वेगळी का? असा सवालही विखे-पाटील यांनी उपस्थित केला.
आपण आज किंवा उद्या संभाजीराजे यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपली भूमिका ही समन्वयाची आहे. संभाजीराजे यांना आंदोलन पुढे ढकलण्याची विनंती आपण करु. सगळे एकत्र येऊन आठवड्याभरात बैठक घेऊ. कोणत्याही आंदोलनाचं नेतृत्व सामुदायिक असावं, असं विखे पाटील यावेळी म्हणाले. संभाजीराजे यांनी राज्यातील संघटनांच्या बैठकीला यावं, अशी विनंती आपण त्यांना करणार आहोत. समाजाचा दबाव वाढला की नेते मंडळी पुढे येतील, असा दावाही विखेंनी यावेळी केला.