मंत्र्याच्या भानगडी व कारनाम्यांमुळे राज्यातील तीनचाकी सरकार पंक्चर

मुंबई : महाभकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कारभारात महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळालीच नाही तर उलट या वर्षभरात या सरकामधील अनेक मंत्र्यांचे कारनामे, भानगडी व मुजोरपणा राज्यातील जनतेसमोर उघड झाला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. आघाडीच्या या ऑटोरिक्षा सरकारच्या तीन चाकात अनेक छिद्रे पडली असून हे सरकार म्हणजे पंक्चर सरकार झाल्याची टिका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली आहे.

 

राज्यातील जनतेने भाजपा-शिवसेना युतीला कौल दिला असतानाही, बेईमानी लबाडी व लाचारी करुन राज्यात महाभकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्याचे सांगताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्राचा विकास करण्याचे स्वप्न त्यांनी राज्यातील जनतेला दाखविले. पण राज्याचा विकास करण्याएवजी भाजपा सरकारने सुरु केलेल्या विकास कामे व प्रकल्पांना स्थगिती देण्याचा सपाटा यांनी लावला. राज्याच्या विकास करण्याची जबाबदारी असलेल्या मंत्री मंडळातील मंत्र्यांनी विकास करण्याएवजी भानगडी, कारनामे व मुजोरपणा केला अशी टिकाही पाटील यांनी केली.

 

पुण्यातील पूजा चव्हाणच्या आत्महत्येत ठाकरे सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याचे नाव सध्या झळकत आहे. मंत्र्यांचे तरुणीसोबत अनैतिक प्रेम संबंध होते आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली अशी माहिती प्रसिध्दी माध्यमांवर आल्यानंतर व भाजपाने हा विषय एरणीवर आल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी या विषयी चौकशी करण्यात येईल असे जाहीर  केल्याचे पाटील यांनी निर्दशनास आणून दिले. ठाकरे सरकार मधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कुबली दिली.

 

संपूर्ण राज्यात या मुद्द्यावर निदर्शने झाली तरीही त्या भानगडीबाज मंत्र्यांनी अद्यापही राजीनामा दिला नाही. पण याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर निर्णय घेऊ असे सांगत महाविकासमधील जाणता राजाने त्या मंत्र्यांना वा त्याच्या कथिक कृत्यांना पाठीस घातल्याचा आरोप करत चंद्रकांतदादा पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला.

 

पुढे ते म्हणाले, सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांच्या जावयाला ईडी ने ड्रग्स प्रकरणात अटक केली तर एका कॅबिनेट मंत्र्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे न्यायालयाने त्यांना शिक्षाही सुनावली आहे. आणखी एक मुजोर कॅबिनेट मंत्र्यांनी आपल्या विरोधातील एक फेसबुक पोस्ट सहन न झाल्यामुळे एका इंजिनिअर युवकाला बेदम मारहाण केली होती आणि स्वतः ते मंत्री मारहणीच्यावेळी उपस्थित होते. पण सत्तेसाठी लाचार झालेल्या मुख्यमंत्र्यांनी या गंभीर प्रकरणांमध्ये आपल्या सहकारी मंत्र्यांना पाठिशी घातले व त्यांच्या भानगडींवर पांघरुण घातले.

 

ठाकरे सरकारमधील कॅबिनेट मंत्र्याच्या मतदारसंघातहिंदू कुटुंबांना पळवून लावले जात आहे आणि हिंदूंचा सर्वेसर्वा म्हणवणा-या शिवसेनेने सत्तेसाठी तोंडावर लाचारीची पट्टी लावली आहे. ठाकरे सरकार प्रत्येक टप्प्यात अपयशी झाले आहे. जनतेने भाजपा आणि शिवसेनेच्या युतीला कौल दिला होता. परंतु छुप्या दरवाजाने घुसलेल्या शिवसेना–राष्ट्रवादी कॉंग्रेस–कॉंग्रेसने अनैसर्गिक सरकार बनवून महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केल्याची टीकाही पाटील यांनी केली आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: