निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे निधन

पुणे : निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत (वय 91) यांचे आज पुण्यात त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. न्यायमूर्ती म्हणून त्यांनी अनेक ऐतिहासिक खटल्याचा निकाल दिला होता. पुण्यातील पहिल्या एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते. उद्या (ता.16) सकाळी बाणेर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला होता. मुंबई विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली होती. त्यानंतर पी. बी. सावंत यांनी मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकीली केली. 1973 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. 1989 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात सावंत यांची नियुक्त करण्यात आली होती. ते प्रेस काँन्सिल आँफ इंडियाचे अध्यक्ष होते.

तत्कालीन राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक, पद्मसिंह पाटील, सुरेश जैन आणि विजयकुमार गावित यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी एक सप्टेंबर 2003 रोजी स्थापन केलेल्या आयोगाचे पी. बी. सावंत अध्यक्ष होते. त्यांनी 23 फेब्रुवारी 2005 रोजी आपला अहवाल सरकारला सादर केला होता, ज्यात नवाब मलिक, पद्मसिंह पाटील आणि सुरेश जैन यांच्यावर आरोप होते, परंतु विजयकुमार गावित यांना दोषमुक्त केले गेले. यामुळे दोन कॅबिनेट मंत्री सुरेश जैन आणि नवाब मलिक यांनी राजीनामा दिला होता. जून 1982 मधील एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी प्रकरणात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: